
अजूनही तुला कदाचित मैत्रीचे अतूट बंध हवे असतील , नाहीतर केवळ ओळखीचं स्मित देणारा एखादा बेनाम चेहरा
किंवा तुला एखादा प्रेक्षक , वाचक, कुणी तरी तुझा हुरूप वाढवणारा, दाद देणारा दर्दी हवा असेल,
अथवा असं ही असू शकेल तू मला केंव्हाच विस्मृतीच्या कोशात जमा केलं असेल.
परंतु मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय , तुझ्या स्मरणाशिवाय.
तुझे शब्द, तुझी आठवण, तुझ्या बरोबरचे क्षण असे काही हृदयात कोरले गेले आहेत की.....
काळाने कितीही घाव घातले तरीही ते कोरीव काम अबाधितच आहे.
तुला बंधमुक्त करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.
मी तुला ,तुझ्या आठवणींना विसरायचं ठरवतो पण हा संकल्प काही क्षणच टिकतो
एखादी गझल आठवते , एखाद्या गाण्याचे सूर दूर वरून ऐकू येतात, चंद्राची कोर दिसते ,
पाउस पडतो, मावळणारं लालसर केशरी सूर्यबिंब दिसतं. कोणाच्या गालावर खळी खुलते
गुलाबाची कळी दिसते, नदीचं संथ पात्र दिसतं, धुक्याने वेढलेले निळे डोंगर दिसतात,
ह्या सगळ्या सगळ्याची जाणीव क्षणभरच टिकते आणि मग पुढचं दृश्य धूसर व्हायला लागतं.
सूर अस्पष्ट होतात अन मग फक्त तू उरतोस
फक्त तू ,
तुझाच स्पर्श,
तुझाच ध्वनी,
तुझीच जाणीव,
तूच.....
No comments:
Post a Comment